मराठवाडय़ात दुसऱया दिवशीही अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात सलग दुसऱया दिवशीही अवकाळी पावसाने बीड, लातूर, जालना जिल्हय़ास झोडपून काढले. अवकाळीने दिलेल्या तडाख्याने शेतशिवाराची रया गेली असून आंबा, सीताफळ, डाळिंब, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. वीज पडून मराठवाडय़ात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाचा जोर 15 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुरुवारी बीड जिल्हय़ाला दोन तास अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. अवकाळी पावसाचा जोर एवढा होता की भरउन्हाळय़ात नदी, नाले खळाळून वाहिले. या पावसाने जिल्हय़ातील फळबागा, मिरची, उन्हाळी बाजरी तसेच मक्याचे अतोनात नुकसान झाले. केशर आंब्याचा सडाच पडला. टरबुजाची प्रचंड नासाडी झाली. शुक्रवारीही गेवराई, वडवणी, अंबाजोगाईला अवकाळीने दणका दिला. माजलगाव, परळीतही दिवसभर पावसाळी वातावरण होते. गेवराई तालुक्यात मन्यारवाडी शिवारात वीज पडून मीना गणेश शिंदे (35) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओंकार (15) हा गंभीर जखमी झाला. बीड, लातूरपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, जालन्यासही अवकाळीने चांगलाच तडाखा दिला. पैठण तालुक्यात टाकळी अंबड येथे वीज पडून सुधाकर पाचे या शेतकऱयाचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातही अनेक ठिकाणी अवकाळीने दाणादाण उडवली. उंडणगाव येथे मोटारसायकलवर वीज पडल्याने जाबेर शेख रऊफ (22) हा ठार झाला तर त्याची आई हाजराबी ऊर्फ शबाना शेख रऊफ (45) या गंभीर जखमी झाल्या.

पंढरपूरलाही आज तिसऱयाही दिवशीही पावसाने हजेली लावली. आंबा, द्राक्षे, डाळिंब, जांभूळ, शेवगा या पिकांना फटका बसला आहे. द्राक्षांचे नुकसान झाले आहे, तर पैऱयांचा सडा पडला आहे. पंढरपूर शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.

बीडला झोडपले

गुरुवारी दोन तास बालाघाटला झोडपल्यावर निसर्ग शांत होईल असे वाटत असतानाच शुक्रवारीही अवकाळीने गेवराईचा गोदाकाठ, वडवणीतील डोंगरपायथ्याला जबर तडाखा दिला. काही भागांत गारपिटीचे तुफानही आले. दोन दिवसांच्या अवकाळीने शेतशिवाराची रयाच घालवली असून आंबा, सीताफळ, डाळिंबाच्या बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत.