तुळजापूरहून ज्योत आणताना पिकअप उलटून दोघे ठार; मोहोळजवळ कामती येथे अपघात

नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून ज्योत घेऊन गावाकडे जाणाऱ्या भाविकांची पिकअप सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर रस्त्याकडेला खड्डय़ात पलटी झाल्याने दोन तरुण ठार झाले, तर सहाजण जखमी झाले. हा अपघात आज सकाळी मोहोळ तालुक्यातील कामती येथे घडला. प्रदीप सुरेश क्षीरसागर (वय 20) आणि नेताजी अंकुश कराळे (वय 23, दोघेही रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील पिकअप श्रीक्षेत्र तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी पिकअप करून गेले होते. त्यामध्ये अनेक तरुण होते. आज सकाळी ज्योत घेऊन परत गावाकडे जात असताना, सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर कामती खुर्द गावच्या हद्दीत पिकअप कठडय़ावरून पलटी होऊन रस्त्याकडेला गटारीत पडली. या अपघातात प्रदीप क्षीरसागर व नेताजी करळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, रोहित अशोक माने (वय 14), रोहित दिलीप कसबे (वय 20), समाधान मोहन मासाळ (वय 29), सोहेल राजू मुलानी (वय 32), महेश भारत बंडगर (वय 17) (पाचही जण रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) आणि वैभव अर्जुन हजारे (वय 24, रा. वाडेगाव, ता. सांगोला) हे जखमी आहेत. जखमींवर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, कामती पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर गोणेवाडी गावावर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोलापूरच्या दिशेने धाव घेतली. या अपघाताचा तपास कामती पोलीस करत आहेत.