मिंधे सरकारने ST कर्मचाऱ्यांना फसवलं! पगारवाढ 2020 पासून नाही तर, 2024 पासून मिळणार; श्रीरंग बरगेंचा संताप

राज्यातील महायुती सरकारने हजारो एसटी कर्मचाऱ्यांना फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी संप केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट 6500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून देणार असल्याचे सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर, सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची ही घोर फसवणूक आहे. 2024 पासून पगारवाढ देऊन सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा संताप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचारी संघटनांच्या 23 प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 6500 रुपयांची घसघशीत वाढ करण्याची घोषणा झाली. विशेष म्हणजे 2020 पासून ही पगारवाढ लागू होईल, असे सांगितले होते. पण आता ही पगारवाढ 2024 पासून देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल 2020 पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ती लागू झाली असती तर साधारण 3200 कोटी रुपयांच्या रकमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता. पण मिनिट्स काढताना एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर फरक दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे, असे श्रीरंग बरगे म्हणाले.