जालन्यात भीषण अपघात; बस-ट्रकची समोरासमोर धडक, 6 जणांचा मृत्यू, 45 जखमी

जालन्यामध्ये एसटी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले आहेत. यातील 9 जणांना गंभीर, तर 30-35 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अंबाजोगाईकडून अंबेडकडे येणाऱ्या बस (क्र. एमएच 20 बीएल 3573) आणि जालन्याच्या दिशेने निघालेल्या आयशर (क्र. एमएच 01 सीआर 8099) यांच्याच शहापूर-मंठताडा येथे समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. या अपघातानंतर गेवराई-अंबड रोडची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

एसटी बस आणि ट्रकच्या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे अद्याप कळालेली नाहीत.