रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत, प्रवासी मात्र चेंगराचेंगरीत जखमी; संजय राऊत यांचा घणाघात

वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. अशा दुर्दैवी घटना घडत असताना रेल्वेमंत्री काय करत आहेत, ही जबाबदारी कोणाची आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला. बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेनच्या बाता ते मारतात, मात्र मुंबईतील उपनगरीय प्रवाशांच्या समस्या अनेक वर्षे तशाच आहेत, त्या सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री काहीही करत नसून ते बुलेट ट्रेनच्या स्वप्नात आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात सुमारे 28 मोठे रल्वे अपघात झाले आहेत. ते बुलेट ट्रेन, हाय स्पीड ट्रेनबाबत चर्चा करत आहेत. मात्र, मुंबईतील उपनगरीय सेवेबाबात ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्याबाबत चर्चा करण्यास कोणीही तयार नाहीत. सर्वाधीक प्रवासी मुंबई आणि मुंबई उपनगरात आहे. असे असूनही मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या समस्या अनेक वर्षांपासून तशाच आहेत. आज रविवारीही प्रचंड गर्दी होत चेंगराचेंगरीची घटना घडली, अनेक प्रवासी जखमी झाले, हे दुर्दैवी आहे.

अशी दुर्घटना घडून ही रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत आहेत. त्यांचे पाय जमीनीवर नाहीत, ते बुलेट ट्रेनच्या विचारात आहेत. मात्र, आमचे मुंबईतील प्रवासी चेंगराचेंगरीत मृत्यू पावत आहेत. मोदी यांच्या काळात 17 मोठे अपघात आणि इतर अपघात आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना घडत असूनही रेल्वमंत्र्यांनी काय केले, त्यांची ख्याती हायफाय, उद्योगपती अशी आहे. मात्र, रेल्वे सेवा सुधारण्यासाठी त्यांनी काय केले, असा परखड सवालही संजय राऊत यांनी केला. या घटनेला जबाबदार कोण आहे, असा सवालही त्यांनी केला.

राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्वाला सुरुवात केली. राजकारणात विचारांची लढाई विचारांनी व्हावी, हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संसकृती आहे. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हावी, वैयक्तीक हेवेदावे, शत्रूत्व राजकारणात असून नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा संस्कार यशवंतराव चव्हाणांपासून, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत कायम होता. मात्र, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले. राजकीय वैर राजकारणातच ठेवले पाहिजे, ती विचारांची लढाई आहे. त्यात वैयक्तीक सत्रूत्व आणू नये, कोणचेही कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असे आमचे मत असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजप दुर्दैवाने हे सर्व करत आहेत. फडणवीस आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तीक शत्रू म्हणून पाहत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दलित, शोषित आणि वंचित सामाजाचे नेतृत्व करणारे नेते दुर्दैवाने फक्त स्वतःचा विचार करतात. मात्र, समाजाला काय मिळाले, याचा विचार कोणीही करत नाही. सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून त्यांनी समजाला बांधून ठेवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करण्याच्या नावाखाली त्यांनी समाजाला लढत ठेवले. रामदास आठवले यांना काही मिळाले नाही, असे म्हणता येणार नाही. ते अनेक वर्षे मंत्री आहेत. ते चांगल्या बंगल्यात राहतात. समाजाचे मात्र हाल होत आहेत. मात्र, आता हे सर्व जनतेला समजले असून जनता आता महाविकास आघाडीसोबत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते महायुतीत आहेत, त्यांना जागा देण्यात आली नाही, तर महाविकास आघाडी त्यांना जागा देणार काय, असा टोलाही त्यांनी लगावला.