संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच हे कथानक रचण्यात आलं; संजय राऊत यांचा मिंधे, फडणवीसांवर हल्लाबोल

बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुंकलींच्या लैगिंक शोषणातील आरोपी अक्षय शिंदे याचे संशयास्पद एन्काऊंटर झाले आहे. या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वच्छतागृहात काम करणाऱ्याला बंदूक चालवता येते का, पोलिसांची लॉक असलेल्या बंदूकीने त्याने गोळीबार कसा केला, असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोणालातरी वाचवण्यासाठी मिंधे, फडणवीस यांनी हे कथानक रचल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

स्वच्छतागृहात काम करणाऱ्याला बंदूक चालवता येते का, पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक लॉक असते. ती हिसकावून लॉक काढून आरोपीने गोळीबार केला, हे कोणालाही पटण्यासारखे नाही. स्वच्छतागृहात काम करणारा मुलगा कधीपासून बंदूक चालवायला लागला, हा साधा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि पोलिसांना आपटे, कोतवाल यांना वाचवायचे आहे. त्यांना वाचवण्यासाठी मुख्य पुरावा नष्ट करण्यात आला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

बदलापूरच्या घटनेनंतर जनता संतप्त होती. जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय करतो. आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या, अशी मागणी जनतेने केली होती. जनतेने अधिकारी आणि मंत्र्यांना पिटाळून लावले होते. लोकभावना तीव्र होत्या. कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, अशी घोषणा गृहमंत्री फडणवीस यांनी केली होती. तर या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सरकारला एक प्रश्न आहे की, त्यांनी दुसऱ्या दिवशी आंदोलन करणाऱ्या हजारो लोकांना अचक करून त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

आरोपीचे एन्काउंटर करत जनतेची मागणी न्याय्य होती, हेच सिद्ध झाले आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला चालवला गेला नाही. संशयास्पद पद्धतीने हे एन्काउंटर झाले आहे. त्यामुळे आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला हवे. बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत पास्को कायद्यातंर्गत गुन्हे दाखल असलेल्यांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला. आता अक्षय शिंदेची हत्या केल्यानंतर किंवा एन्काऊंटर केल्यानंतर या सर्व आरोपींना हजर केले जाईल. हे खूप मोठे षडयंत्र आहे. कोणालातरी वाचवायचे आहे, हे यातून स्पष्ट दिसून येत आहे. तसेच ज्यांना वाचवायचे आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला.

खऱ्या दोषींना आरोपींना का वाचवण्यात येत आहे, घटनेच्या काळातील शाळेतील सीसीटिव्ही फुटेज का गायब करण्यात आले. सीसीटिव्ही फुटेज हा महत्त्वाचा पुरावा असतो. मारल्या गेलेल्या आरोपीने हे फुटेज गायब केलेले नाही. हे फुटेज शाळेच्या संस्थाचालकांनी गायब केले. शाळेची संस्था भाजपशी संबंधित आहे. हे सर्व लोकं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठीच कालचे कथानक रचण्यात आले, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अक्षय शिंदे याची बाजू कोणीही घेत नाही. त्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. तर ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ते मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. झटपट न्याय करा, हीच आंदोलकांची मागणी होती. आता तेच करण्यात आले आहे. मिंधे आणि फडणवीस खोटे बालून जनतेची दिशाभूल करत आहेत. आधी सांगितले आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हात बांधलेला आरोपी पोलिसांच्या कमरेची बंदूक हिसकावून आत्महत्या करतो काय, असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर काही वेळातच सांगितले की त्याने गोळीबार केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एन्काऊंटर केले. त्यामुळे आधी काय खोटे बोलायचे, ते ठरवून खोटे बोला, असा टोलाही त्यांनी लगावला. ते दररोज खोटे बोलत आहे. मात्र, या प्रकरणी काय खोटे बोलायचे, ते कॅबिनेटमध्ये ठरवा आणि त्यानंतर बोला, असेही संजय राऊत म्हणाले.

आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी, यात दुमत नाही. मात्र, कोणालातरी वाचवण्यासाठी असे कथानक रचत दिवसाढवळ्या केलेला हा खून आहे. राज्यातील सध्याचे वातावरण बघात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने यांच्या मिरची आणि आग लावली आहे, त्यापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठीच हे सर्व रचण्यात आले आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.