मोदी, शहाच्या मेहरबानीवर चालणाऱ्या निवडणूक आयोगाला शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; संजय राऊत कडाडले

शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा खरा मेळावा आहे, याला अनेक वर्षांची वैचारिक परंपरा आहे. मात्र, सध्या काहीजण डुप्लिकेट शिवसेनेच्या नावाने काहीजण पिपाण्या वाजवत आहेत. आमच्या रणशिंगासमोर या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असे त्यांनी ठणकावले.

काही लोकांनी पक्ष आणि चिन्ह चोरले असेल पण मूळ शिवसेनेचा विचार आणि जनता आमच्यासोबत आहे. कोणती शिवसेना खरी किंवा खोटी हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. सध्या निवडणूक आयोग मोदी, शहा यांच्या मेहरबानीवर चालत आहे. काही दिवसांनी हा आयोग निवृत्त होौणार आहे. त्यामुळे शिवसेनेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. जनतेने असली शिवसेना कोण आहे, ते दाखवून दिले आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. आज या मेळाव्यात रणशिंग फुकंले जाणार आहे. या रणशिंगांसमोर फुंकण्यात येणाऱ्या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

हुतात्मा स्मारकातील हुतात्मांच्या हातात मशाल आहे. तीच मशाल आता आमच्या हातात आहे. दिल्लीतील सत्ताधारी आणि व्यापारी मंडळाचे नेते मोदी, शहा महाराष्ट्राची लूट करत आहेत. जे लोकसभेला त्यांच्यासोबत उभे राहिले त्यांनी या सुटीला पाठिंबा दिला, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र आणि मुंबई लुटण्याचे काम सध्याचे रावण करत आहे. यंदा महाराष्ट्रातीलप रावणदहन अखेरचे असेल, य़ानंतर राज्यात रावण निर्मणच होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही संजय राऊत म्हणाले.