गद्दारीचा कचरा आपल्याला साफ करायचा आहे, संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयावर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत देखील होते व त्यांनी जनतेला संबोधित करताना मिंधे गटावर सडकून टीका केली आहे. ”आपल्याला कल्याण डोंबिवली मतदारसंघातून गद्दारीचा कचरा साफ करून भगवा फडकवायचा आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

”आमच्या घराणेशाहीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आमची घराणेशाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणासाच्या स्वाभिमानाची व हिंदुत्वाच्या विचारांची घराणेशाही आहे. ती घराणेशाही पुढे घेऊन शिवसेना चाललेली आहे. ही गुलामीची, गद्दारीची घराणेशाही महाराष्ट्रात व शिवसेनेत चालणार नाही’, असा टोला त्यांनी गद्दार मिंध्यांना लगावला आहे.

”कल्याण डोंबिवली जिथे जाऊ तिथे लोकं उत्स्फुर्तपणे साहेबांच्या स्वागतासाठी बाहेर पडतायत. हिच खरी शिवसेना आहे. हे जे वातावरण आहे ती खरी शिवसेना आहे. या शिवसेनाचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाही. राहुल नार्वेकर कागदावर इथे तिथे फिरवतोय ती ही शिवसेना नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे व या शिवसेनेला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही. कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आणि गद्दारीचा कचरा साफ करायचा. त्या लढाईला आजपासून सुरुवात झाली आहे”, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे