मुख्यमंत्र्यांना हटवून सरकार बरखास्त करा; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा! – संजय राऊत

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या हत्या होताहेत, पोलीस स्थानकात गोळीबार सुरू आहे. हे अपयश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आहे. त्यांनी महाराष्ट्रावर माफियाराज लादले आहे. महाराष्ट्रावर काढलेला हा सूड असून हे अपयश राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचे आहे, असा जबरदस्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मोदी आणि शहा राज्याचे गुन्हेगार असून त्यांनी हे शासन आमच्या माथी लादलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात, गावागावात रक्ताचे सडे पडत आहेत. लुटमार, दरोडे, अपहरण, बलात्कार, हत्या वाढत आहे. मोदी आणि शहा काय करताहेत? त्यांनी हे सरकार लादलेले असून त्यांची जबाबदारी नाही का? मुख्यमंत्र्यांना हटवून सरकार बरखास्त करा आणि हिम्मत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणीही राऊत यांनी केली. तसेच आमदार, खासदार पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत, अरेरावी करत आहेत. याला कायद्याचे राज्य म्हणतात का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना गुंड, माफिया सातत्याने भेटत आहेत. ठाण्यापासून मुंबईपर्यंत त्यांच्या अभिनंदनाचे, स्वागताचे बोर्ड गुंड, माफिया लावताहेत. अनेक कॉन्ट्रॅक्ट, सरकारी कामं गुंडांना दिली जाताहेत. 8 हजार कोटींच्या अॅम्ब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं, त्याच्यात मुख्यमंत्र्यांशी संबंधित किती माफियांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंधित आहे हे लवकर बाहेर येईल, असेही राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवायची, माफियांना बळ द्यायचे. पोलीस हे गुंडांचे सरक्षक झालेले आहेत. शिंदेंच्या टोळीत गुंड आणि पोलीस एकत्र आहेत. मुंबई, ठाण्यासह ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत ते सगळे शिंदेगँगचे सदस्य आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कल्याणला गणपत गायकवाडने गोळीबार केला, त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचे नाव आलेले आहे. पोलिसांनी ताबडतोब शिंदेंची चौकशी करायला हवी होती. इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता, कोणाचे नाव आरोपीने घेतले असते तर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन स्टेटमेंट घेतले असते आणि एफआयआर दाखल केला असता. पण आरोपी गणपत गायकवाड सांगताहेत की शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे पडलेले आहेत. तरीही कायदा, पोलीस त्याच्यावर आक्षेप घ्यायला तयार नाही. कारण ते मुख्यमंत्री आहेत. पण एकीकडे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे. पण महाराष्ट्रात गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जाब विचारला जात नाही हे दुर्दैवी आहे, असेही राऊत म्हणाले.

गेल्या दीड वर्षात रोज गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत. पुण्यात गुंडाची हत्या होते, नगरमध्ये आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत, राहुरीत आढव या वकील दाम्पत्याची अपहरण करून हत्या झाली, मुंबईत अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? ते अदृश्य आहेत. गृहमंत्री विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत आहेत. मग महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार? असा सवाल करत राऊत यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.