देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला मागून धडकली, 7 जण जागीच ठार

अरावली जिल्ह्यातील श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमबादाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली. साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे झालेल्या या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पार चेंदामेंदा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कारमध्ये एकूण 8 जण होते. हे सर्व श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमदाबादकडे येत होते. मात्र भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चेंदामेंदा झालेली कार कटरच्या सहाय्याने कापून मृतेदह बाहेर काढण्यात आले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी होता. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर कारचा पार चक्काचूर झाला होता. त्यावरून कारचा वेग जास्त असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि प्रशासनाने अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.