गुंडांचं राज्य गुंड चालवत आहेत, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे. उद्योग, कृषी, विकास याबाबतीत मागे पडलो आणि गुंडगिरी, झुंडगिरी, माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चालला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुंडांना पाठीशी घालत आहे. त्यांच्यामुळे गुंड फोफावले असून गुंडांचे राज्य गुंड चालवत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर चढवला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी पुण्यात निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ठिकाठिकाणी सभा घेणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. याचा खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करताना म्हटले की, शेवटच्या घटका मोजणाऱ्या भारतीय जनता पक्षाने भाडोतरी गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केली आहे. निखिल वागळे, वकील असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी बालंबाल बचावले. हा काय प्रकार आहे? पोलीस खाते सध्या गुंडांना सलाम करण्यात गुंतले आहे. ज्या गुंडांची धिंड पोलिसांनी ठिकठिकाणी काढली, त्या गुंडांना शिंदे गँगमध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश मिळत असेल आणि त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी या पोलिसांना लावले जात असेल तर राज्यात दुसरे काय घडणार? असा सवालही राऊत यांनी केला.

गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले तरी हे राजीनामा मागतील असे फडणवीस म्हणतात. मग सामाजिक कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांना कुत्र्यांचे पिल्लू वाटत आहे का? निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर कुत्र्याची पिल्लं मेली म्हणून तिकडे दुर्लक्ष करणार का? शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. अभिषेक घोसाळकर, त्यांची पत्नी, लहान मुलगी, माता-पिता हे कुत्र्याचे पिल्लू आहे का? तुमची जबाबदारी नाही का? असे एकामागोमाग एक परखड सवाल करत राऊत यांनी सरकारच दिल्लीत जाऊन शेपट्या हलवते आणि महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर भुंकते, असा हल्ला चढवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

भाजपला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागली आहे. दिल्लीतले आणि राज्यातलेही सरकार बदलत आहे हे भाजपच्या गुंडांनी लक्षात ठेवावे. तेव्हा या हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू, असा इशाराही राऊत यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद असून त्यात ते सविस्तर बोलतील, पण राज्यात भाजपच्या आशिर्वादाने आणि मुख्यमंत्री मिंधेंच्या प्रेरणेने गुंडगिरी सुरू आहे. हे राज्य इतके बदनाम कधीच झाले नव्हते, असेही राऊत म्हणाले.

देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणारं भाजपा ‘गुंड’राज्य आणि ‘गन’राज्य चालवतंय!

ते पुढे म्हणाले की, मी आजही मुख्यमंत्र्यांचा एका गुंडाबरोबरचा फोटो टाकला आहे. जन्मठेप, खून, अपहरण, हत्या, 302 च्या केसेस असणाऱ्या महात्मासोबत मुख्यमंत्री सेल्फी काढत आहेत. मुख्यमंत्र्यांचे रोज गुंडांबरोबरचे फोटो समोर येत असून गुंडांच्या साथीनेच राज्य चालवत आहेत. काय करताहेत गृहमंत्री? त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एफआयआर दाखल करून, एसआयटी स्थापन करून चौकशी करायला हवी, अशी मागणी करत राऊत यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेपेक्षाही राज्यावर एक निष्क्रिय गृहमंत्री लादले हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले.