निवडणूक आयोग एका पक्षाचा, व्यक्तीचा गुलाम झालाय; संजय राऊत यांनी फटकारले

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

”भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या नावातून आता भारतीय काढून टाकले पाहिजे. ते आता भारतीय नाही राहिले. ते आता एका पक्षाचे गुलाम झाले आहेत. एका व्यक्तीचा गुलाम बनला आहे निवडणूक आयोग. गळ्यात एका पार्टीचा पट्टा आहे. जर असंच चालत राहिलं तर ना हा देश राहिल ना लोकशाही राहिल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी आता निवडणूका घेतल्या तर जनताच यांना धडा शिकवेल, असा विश्वास व्यक्त केला. ”शरद पवार असो वा उद्धव ठाकरे असो… ज्यांनी पक्ष बनवला ते तुमच्या समोर उभे आहेत तरी तुम्ही पक्ष ऐऱ्या गैऱ्याला देताय. हा कोणता खेळ खेळताय. निवड़णूक आयोगाने पक्ष कुणाला दिला त्याचा अर्थ पक्ष त्यांचा झाला असं नाही. जनता जो ठरवेल त्याचाच पक्ष राहणार. आता निवडणूका घ्या बघा हे निवडणूक आयोग कसे कचऱ्यासारखे उडून जाईल”, असे ते म्हणाले.

”देशात सध्या दोनच नेते आहेत. ज्यांची हुकुमशाही सुरू आहे. ते जे बोलतील तेच होतेय. पण न्यायालय, संसद निवडणूक आयोग यांच्या तरी मर्यादा तुम्ही पाळल्या पाहिजे’, असे संजय राऊत म्हणाले.