भाजप फक्त धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजतेय! संजय राऊत यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले. दर्शन झाल्यानंतर त्यांनी तेथील कांदा उत्पादक शेतकऱयांचीही भेट घेतली पाहिजे होती. पण देशाला पोसणाऱया शेतकऱयांच्या डोळय़ातील अश्रूच त्यांना दिसत नाहीत. भाजपला फक्त धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचे काम येते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला.

मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा आनंद आहे. पण कांदा उत्पादक शेतकऱयांनाही त्यांनी भेटायला हवे होते, असे राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ अशी गर्जना उगीच दिली जात नाही. भाजपचा किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असे म्हणताना ऐकले आहे का? असा सवाल त्यांनी केला.

…म्हणूनच मोदी काळाराम मंदिरात गेले
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारी रोजी काळाराम मंदिरात जाऊन आरती करण्याचे जाहीर केल्यानंतरच पंतप्रधान मोदी यांचा काळाराम मंदिरात जाऊन पूजाअर्चा करण्याचा कार्यक्रम अचानक ठरला, असे ते म्हणाले. शिवसेनेवर कुरघोडी करतोय असे भाजपकडून दाखविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करतानाच, राम हे कुरघोडी करण्याचे साधन आहे का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला.

शिवसेना कुठे होती कळेल
बाबरी कोसळताना शिवसेना कुठे होती हे पाहायचे असेल तर फडणवीस यांनी आरोपपत्र पाहावे आणि त्यात किती शिवसैनिक आहेत हे सांगावे, असे राऊत म्हणाले. ‘सामना’वरच दीडशे खटले दाखल झाले. बाळासाहेब आणि मी लखनऊच्या न्यायालयात हजर झालो होतो. मोरेश्वर सावे आणि अनेक आमदार, नगरसेवक त्या आंदोलनात होते. भाजपसह असलेल्या शिंदे गटातील शेळय़ा-मेंढय़ा तिथे नव्हत्या.

फडणवीस म्हणजे शूर्पणखा… 2024 मध्ये नाक कापू
“बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांनी राम मंदिर आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेलेचपाटे कुठे होते?’’, असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी फडणवीस यांना शूर्पणखेची उपमा दिली आणि 2024 मध्ये या शूर्पणखेचे नाकच कापू, असा इशारा दिला. बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात, असा हल्लाबोलही त्यांनी केला.