आजचा रावण अजिंक्य नाही! संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला

रामायणात एकच रावण होता. पण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत दिल्लीपासून नाशिक, नागपूर आणि महाराष्ट्रात अनेक रावण निर्माण झालेले दिसतात. आपल्याला वाटते की, आजचा रावण अजिंक्य आहे. अरे पण रामायणातील रावणही अजिंक्य नव्हता. त्या रावणाला बालीनेही हरवले होते. त्यामुळे रावण अजिंक्य आहे हे डोक्यातून काढून टाका, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

शिवसेनेच्या राज्यव्यापी महाशिबिरात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी रामायणाचे दाखले देत अत्यंत तडाखेबंद भाषण केले. त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळय़ा पडत होत्या तर कधी हशा उसळत होता.

श्रीरामाचे जे धैर्य आणि शौर्य आहे ते शिवसेनेचे आहे. आणि रामाचा जो संयम आहे तोच उद्धव ठाकरे यांचा आहे. धैर्य हे मानव जातीला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. ते धैर्य जर नसते तर शिवसैनिकांनी बाबरी मशिदीचे घुमट तोडले नसते.

धैर्य व आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे तो कधीच हरला जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही. डरो मत, झुको मत आणि सत्याच्या मार्गाने चला हा रामकथेचा संदेश असल्याचे ते म्हणाले.