शिवसेनेचं व धारावीकरांचं नातं कधीच कुणी तोडू शकणार नाही, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी धारावी येथील शिवसेनेच्या शाखेला भेट द्यायला गेले होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाडला. तसंच धारीवकरांच्या मनात हृदयात शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचं व धारावीकरांचं नातं कधीच कुणी तोडू शकणार नाही; असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

”असं म्हणतात ज्याने धारावी जिंकली त्याने मुंबई जिंकली. धारावीकरांच्या हृदयात शिवसेना आहे, मनात शिवसेना आहे. शिवसेनेचं व धारावीकरांचं नातं कधीच कुणी तोडू शकणार नाही. या धारावीत उंचच उंच इमारती नाहीत, टॉवर नाहीत, बंगले नाहीत. इथे साधी घरं आहेत. त्या साध्या घरात जो सामान्य माणूस राहतो तो प्रमाणिक आहे. तो कुणाला विकला जाणारा नाही म्हणून तो शिवसेनेनसोबत उभा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही धारावीकरांसाठी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. आज संसदेत मोदींनी भाषण केलं. पुढल्या पाच वर्षात या देशात सर्वांना घरं देण्याचं जाहीर केलं होतं. 2014 मध्येही तिच घोषणा केली होती. 2019 लाही तिच घोषणा केली होती. गेल्या दहा वर्षात कुणालाही घरं मिळालेली नाहीत. आमच्या धारावीकरांना कधी घरं मिळतील माहित नाही. पण अडाणींना एक लाख कोटी मोदी देणार आहेत. या धारावीच्या जीवावर हे सर्व सुरू आहे. यांचं हे सगळं कारस्थान आपल्याला उधळून लावायचं आहे, असे आवाहन राऊत यांनी धारावीकरांना केले.

”धारावीचा रंग एकच आहे. भगवा रंग आहे धारावीचा. धारावीने कायम पाठिशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. मुंबईचा विकास धारावीच्या विकासापासून करायला हवा. जेव्हा आपली सत्ता येईल तेव्हा धारावीच्या विकासापासूनच आम्ही सुरुवात करू, असे संजय राऊत म्हणाले.