राज्यात गुंडांचे राज्य, फडणवीस राजीनामा द्या! संजय राऊत कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कडाडले आहेत. हे राज्य गुंडांच्या तावडीत आहे आणि फडणवीस चाय पे चर्चा करत फिरत आहेत. फडणवीस राजीनामा द्या, अशा शब्दांत संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत..राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या!, अशा शब्दांत संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कडाडले आहेत.

महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश नरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.