Sanjay Raut News – बेईमानांना लाडक्या बहिणी ओवाळणी टाकणार नाहीत, संजय राऊत यांचा घणाघात

लाडकी बहीण योजना ही मतं विकत घेण्याच्या हेतूने आणलेली योजना आहे. त्यामुळे बेईमानांना लाडक्या बहिणी ओवाळणी टाकणार नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यात ठाकरे-2 सरकार येणार असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

राऊत म्हणले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात ठाकरे – 2 सरकार येणार. ठाकरे – 1 हे सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे ठाकरे – 2 सरकार हे कुणीही थांबवू शकत नाही. कितीही पैसे वाटा, निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करा, योजना आणा, पैश्यांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा. निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील.

आम्हाल मत नाही दिले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ असे विधान रवी राणा यांनी केले होते. यावर संजय राऊत म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की, या योजना  त्या लाडक्या बहिणींसाठी नसून  त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. त्यांच्या भावना किती कलुषित आहेत हे दिसतं. हे पैसे काय त्यांच्या खिशातले आहेत? तुम्ही कोण आहात पैसे काढून घेणारे, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा लोकसभेत पराभूत झाल्या म्हणून त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल. आणि यावेळेला रवी राणांचाही पराभव होणार आहे. सत्ताधारी आमदार, नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत. की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मतं द्या. नाहीतर पंधराशे रुपये परत घेऊ. हे पैसे त्यांच्या बापजाद्यांचे आहेत का? हा जनतेच्या करातला पैसा आहे, त्या पैशांवर त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर गेला आहे. त्यातून त्यांना पैसे मिळणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की ही योजना सरकारी आहे, महिलांना लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा या 1500 रुपयांमध्ये नक्की वाढ केली जाईल. दीड हजार रुपयांत घर चालतं का राणा यांनी घर चालवून दाखवावं असे राऊत म्हणाले.

लाडकी बहिण योजना ही चांगल्या हेतुने आणली नसून महिलांची मत विकत घेण्यासाठी या हेतुने आणली आहे, असे राऊत म्हणाले. अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार विधानसभेत पुन्हा दिसणार नाहीत, लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करणार. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाहीत. हे बोलणारे सगळे सरकारी लोचट मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सरकारी पैश्यांची उधळपट्टी, भ्रष्टाचार होतोय. आमदारांना पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला 100 कोटी रुपये, पक्षांतरासाठी नगरसेवकांची किंमत पाच कोटी रुपये आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये. ते सुद्धा मत नाही मिळालं की काढून घेऊ, ही महाराष्ट्राची अवस्था आहे. जर ही यांची भाषा असेल तर हा लाडक्या बहिणींचा अपमान आहे.  लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत असेही राऊत यांनी सांगितले.

मोदी आणि अमित शहा प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रात सभा घ्याव्यात.  आणि फडणवीसांच्या हाती निवडणुकीची सुत्र असायला हवीत. हा महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत आहे. याचा अर्थ आमच्या 20-25 जागा नक्की वाढतील असे राऊत म्हणाले.

ज्यांनी पक्ष चोरला, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये. एकनाथ शिंदे यांना इतिहास मान्य नाही आणि ते भावनाशुन्य आहेत. लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलतात ते पाहा. लाडक्या बहिणींवर मत देण्यासाठी  कसा दबाव आणला जातोय ते पाहा. ठाण्यात लाडक्या बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावर बुलडोझर फिरवला गेला, कारण त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. ही क्रूर माणसं आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना, त्यांची प्रकृती बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला त्यांच्याविषी काय बोलणार असेही राऊत यांनी नमूद केले.