जरांगे पाटील उपोषणावर आणि मंत्री नाचतायत रस्त्यावर, संजय राऊत यांचे जहाल टीकास्त्र

मराठा आरक्षणाचा मुद्दा, लोकशाहीची रोज होत असलेली गळचेपी यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “माझ्या माहितीप्रमाणे दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे की, मंगळवारी जो सरकारने फसवणुकीचा प्रकार केला 10 टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरलेले आहे. अशावेळी उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे हे असे नाचून प्रश्न सुटणार आहेत का?”

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी अनेकदा शपथ घतेलेली आहे. या लोकांनी आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून कितीवेळा शपथ घेतलेली आहे. बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर खुर्चीसमोर उभं राहून यांच्या शपथांवर काय विश्वास ठेवताय? अशी टीका राऊत यांनी केली.

शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मिनीमम सपोर्ट प्राईज (किमान हमी भाव) हा त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा देशभरातला आहे. मी दोन दिवस दिल्लीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी चर्चा केली. एमएसपी संदर्भात ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे तो शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी ते योग्य नाही. कापूस असेल, उडीद असेल, मका असेल, महाराष्ट्रात द्राक्ष आहे, कांदा आहे , कापूस आहे, महाराष्ट्रातील शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. देशातल्या राज्यांनुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादने वेगळी आहेत. अशावेळी देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावे आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जरी बॉर्डर ओलांडून पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

शेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचे नाही असे सरकारने ठरवले आहे. शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एमएसपीला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीला हात घालणार नाहीत. सरकारकडे इलेक्ट्रोल बॉण्डच्या रुपात भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी आहेत. पीएम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी पैसे पडलेले आहेत. अदाणींना देण्यासाठी हजारो कोटींचे व्यवहार होत आहेत. पण शेतकऱ्यांच्या एमएसपीसाठी साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत. त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे. हळहळू उत्तर प्रदेश, हरियाणा हा हिंदी पट्ट्यातील शेतकरी पुढे जातोय आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे. देशातल्या शेतकऱ्यांनी विशेषता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची दिशाभूल सरकार करतंय का असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये दिशाभूल सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये फसवणुक या निर्यातबंदीसंदर्भात दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्याविरोधात फार मोठे आंदोलन सुरु आहे.. संपूर्ण देशभरात सुरु आहे. पण महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन कृषिप्रधान राज्य आहेत. तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचे पोट भरले जाते. पण त्यांचीच फसवणूक होते.

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल. बैठकांना ब्रेक लागणार का या प्रश्वार उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अजिबात नाही. महाविकास आघाडीच्या बैठका सुरु आहेत. एकमेकांशी संपर्क सुरु आहे. जागावाटपाता तिढा सुटलेला आहे. लवकरत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागावाटप पूर्ण झालेले असेल. महाविकास आघाडीच्या सभा आहेत आणि होतील. सध्या आंदोलन सुरु असल्याने उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यातील काही दौरे रद्द केले. तरीही आम्ही उद्या सकाळी उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघतील. त्यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. नांदेडला उतरुन ते हिंगोली, परभणी अशा भागात असतील.