दोन चेंडू दोन षटकार, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित पहिलाचं

कानपूर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावार केला आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला सलामीवीर ठरला आहे.

कानपुरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी बांगलादेश पहिल्या डावात 233 धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने रेकॉर्डब्रेक फलंदाजी करत 34.4 षटकांमध्ये 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेत पहिला डाव घोषित केला. या धुवाँधार फलंदाजीचे श्रेय जातं टीम इंडियाच्या फलंदाजांना. सलामीला आलेल्या रोहित शर्मा (23 धावा) आणि यशस्वी जयस्वाल (72 धावा) यांनी विस्फोटक फलंदाजी करत पहिल्या तीन षटकांमध्ये 50 धावा कुटून काढल्या. यशस्वीने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकले, मात्र रोहित शर्माने पहिल्या षटकातील पहिल्या दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकले आणि विक्रम झाला.

रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकणारा पहिला सलामीवीर आणि चौथा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही सलामीवीराने पहिल्या दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकले नाहीत. मात्र हा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर नोंद झाला आहे. याव्यतिरिक्त सर्वात प्रथम फॉफी विल्यम्स याने 1948 साली असा विक्रम केला होता. त्याचबरोबर 2013 साली सचिन तेंडूलकर आणि 2019 मध्ये उमेश यादवने सुद्धा अशी कामगिरी केली आहे.