रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला रिमाइंडर

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना सरकारने बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून त्या येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात असा आरोप करत त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे, असे स्मरणपत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्या भारतीय जनता पक्षासाठी काम करतात असे पटोले यांनी या पत्रात नमूद केले आहे. शुक्ला पोलीस महासंचालक पदावर राहिल्या तर आगामी विधानसभा निवडणूक पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पडणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना 24 सप्टेंबर रोजी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा, असे निवेदन त्यांनी दिले होते. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप त्यावर काहीच कारवाई केलेली नाही. शुक्ला यांची अलीकडील नियुक्ती आणि त्यानंतर त्यांना दिलेली मुदतवाढ पोलीस कायदा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.