FIR दाखल करण्यासाठी आता आंदोलनं करावी लागणार का? बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेवर राहुल गांधी यांचा संताप

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधल्या शाळेत चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. कोलकातामधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना बदलापूरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही महाराष्ट्रातील महायुती सरकारला धारेवर धरले आहे. आता लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या भोंगळ कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत बदलापूरच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर आता महाराष्ट्रातील मुलींवर होणारे लाजीरवाणे अत्याचार हे आपण एक समाज म्हणून कुठल्या दिशेने जातोय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय देण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं. आता एफआयआर दाखल करण्यासाठीही आंदोलनं करावी लागणार का? पीडितांना पोलीस ठाण्यात जाणंही इतकं अवघड का झालं आहे? असा सवाल करत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकावर हल्लाबोल केला.

एफआयआर दाखल न होणं म्हणजे पीडितांचे खच्चीकरण करणारं आणि गुन्हेगारांना बळ देणारं आहे. न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मुजोरीचे बळी ठरवू नये, असे म्हणत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे.