UPSC नाही तर RSS मार्फत सरकारी पदांची भरती, IAS चे खासगीकरण ही मोदींची गॅरंटी; राहुल गांधीचा घणाघात

केंद्रिय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी पदांची भरती करून संविधानावर हल्ला करत असल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली. आरक्षण आणि सरकारी पदभरती या मुद्द्यांवरून लोकभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरत केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला.

राहुल गांधी यांनी ट्वीटरवर (X) ट्वीट करत नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या मंत्रालयातील विविध महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून SC, ST आणि OBC प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे. मी नेहमी म्हणत आलो आहे की, वंचितांना देशातील सर्वोच्च पदांवर प्रतिनिधित्व दिले जात नाही. या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याऐवजी त्यांना लॅटरल एंट्रीद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे. हा UPSC ची तयारी करणाऱ्या हुशार आणि होतकरू तरुणांच्या हक्कावरचा दरोडा आणि वंचितांच्या आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर केलेला हल्ला आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फोडली

“काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर विराजमान होऊन शोषण करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे SEBI, जिथे खासगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला प्रथमच अध्यक्ष केले गेले. प्रशासकीय संरचना आणि सामाजिक न्याय या दोघांनाही धक्का देणाऱ्या या देशविरोधी पाऊलाचा इंडिया तीव्र विरोध करेल. IAS चे खासगीकरण, ही आरक्षण संपवण्याची ‘मोदींची गॅरंटी’ आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.