भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी

पुण्याचे हिट अॅण्ड रन प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातून आणखी एक अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन विद्यार्थ्यांची दुचाकी सिग्नलवर थांबली असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी आहे.

आदिल शेख आणि पहाड शेख अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून दोघेही लातूरचे रहिवासी आहेत. ते रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. आदिल आणि पहाडचा मित्र अफान शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वाघोलीतून पुण्याच्या दिशेने भरधाव ट्रक येत होता. त्यावेळी जकात नाका चौकातील सिग्नलवर दुचकीजवळ हे तिघे थांबले होते. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिघांना धडक दिली. त्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर झाला आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता हा अपघात घडला. हे तरुण मुळचे लातूरचे असून वाघोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याप्रकरणी ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याला अटक करण्यात आली आहे.

अपघातानंतर तत्काळ नागरिकांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. घटनास्थळी विमानगर पोलीस पोहोचून त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांपैकी एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दुसऱ्याने उपचारा दरम्यान प्राण सो़डला. तर तिसऱ्या तरुणावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातासंदर्भात माहिती देताना विमाननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतरही ट्रक थांबला नव्हता. मात्र पोलीस आणि लोकांनी अपघातस्थळाच्या 300 मीटर अंतरावर त्याला रोखण्यात यश आले. ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याच्यावर भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.