महाराष्ट्रात खोके आणि धोक्याचे सरकार, जनता लवकरच यांचा हिशोब करेल; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

रत्नागिरी स्टेशनच्या सुशोभिकरणानंतर त्याच्या उद्घाटनाआधीच त्याचे छत कोसळल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मिंधे भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील या घटनेवरून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात खोके आणि धोक्याचे सरकार, जनता लवकरच यांचा हिशोब करेलच, असा हल्लाबोल प्रियंका यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरुन केला आहे.

प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर लिहीले आहे की, महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्ग, जो अद्याप पूर्णपणे तयारही झाला नव्हता, त्यावर 500 हून अधिक खड्डे आणि भेगा पडल्या आहेत. याआधी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत. महाराष्ट्रात ‘खोके आणि धोके’ सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशोब करणार असल्याचा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी केला आहे.