बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले अस्वस्थ करणारे; प्रियांका गांधींनी व्यक्त केली चिंता

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात विद्यर्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पलायन करत हिंदुस्थानचा आश्रय घेतला आहे. मात्र, बांगलादेशमधील आंदोलन हिंसक झाले आहेत. आता बांगलादेशात हिंदूसह इतर अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. अनेक मंदिरांची आणि हिंदूच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू आणि इथर अल्पसंख्याक दहशतीत आहेत. बांगलादेशमधील या परिस्थितीबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. प्रियांका गांधी यांनी बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

प्रियंका गांधी वाड्रा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, धर्म, जात, भाषेच्या आधारावर भेदभाव, हिंसाचार आणि हल्ले कोणत्याही सुसंस्कृत समाजात अस्वीकार्य आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्यावर सातत्याने हल्ले होत असल्याच्या बातम्या त्रासदायक आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. तेथील अंतरिम सरकार अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेजारच्या बांगलादेशात अल्पसंख्याकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर भेदभाव, हिंसाचार आणि हल्ले कोणत्याही सुसंस्कृत समाजात अस्वीकार्य आहेत. आम्हाला आशा आहे की बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल आणि तेथील अंतरिम सरकार हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करेल,असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केलेल्या पलायनामुळे बांगला देशात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच तेथे अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ले होत आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर तेथील हिंसाचारात अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यवसायांची तोडफोड करण्यात आली, आणि महिलांवर हल्लेही झाले.