पक्षाची भूमिका मला माहिती नाही, पण मला परळीतून निवडून द्या! पंकजा मुंडेंचा बावनकुळेंसमोरच एल्गार

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दूधही पोळले. त्यामुळे यावेळी ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. पक्ष काय भूमिका घेणार हे मला माहिती नाही. पण मला परळीतून आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना बीडमधून विजयी करा, असे म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच एल्गार केला. पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या विधानाचा धागा पकडून पंकजा मुंडे यांनी पक्षात होणारी आपली घुसमट पुन्हा बोलून दाखवली. मागच्या काळात खूप वेगवेगळे अनुभव आले. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत दूध पोळले. पण आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. मला काही मिळाले नाही की कार्यकर्ते निराश होतात. पालकमंत्री असताना मी भरपूर कामे केली. आता सत्ता असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत असा टोला पंकजांनी लगावला.

मी भूमिका घेतली आहे

भाजपची भूमिका काय आहे मला माहिती नाही, पण मी मात्र भूमिका घेतली आहे. मला परळीतून आणि राजेंद्र मस्के यांना बीडमधून विधानसभेवर पाठवा असे म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच एल्गार केला. बीड जिल्हा राज्याचे राजकारण करत आहे. पण बीड जिल्हय़ाला गावकुसाबाहेर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र त्यात कुणालाही यश येणार नाही असे म्हणत माझ्या या संघर्षात कोण कोण सोबत आहे अशी साद त्यांनी घालताच  उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मी आता सर्वसमावेशक चेहरा

आगामी 2024 वर्ष हे परिवर्तनाचे, इतिहास घडवणारे आहे. मी आमदार नाही, खासदार नाही. तरीही तुम्हाला वेगवेगळय़ा पक्षांकडून ऑफर येतात, असे पत्रकार विचारतात. मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही; पण मी आता सर्वसमावेशक चेहरा झाले आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा यांच्या या विधानावरून पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही

कार्यक्रमस्थळी आपल्याला फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार आपण केल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यानंतर आपण स्वागताचे हार गळय़ात घालून घेणार नाही, असे जाहीर केले होते. ओबीसी आरक्षण वाचले आणि लोकांनी गळय़ात हार घातले, असेही त्या म्हणाल्या.