मराठा समाजाला तुम्ही न्याय का दिला नाही? ग्रामस्थांचा गद्दार आमदार बालाजी कल्याणकरांना सवाल

गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना निळा गावातील ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. मराठा समाजाला तुम्ही न्याय का दिला नाही? या प्रश्नासह मराठा आरक्षणा संदर्भात अनेक प्रश्न ग्रामस्थांनी बालाजी कल्याणकरांना विचारले. मात्र ग्रामस्थांच्या एकाही प्रश्नाच उत्तर बालाजी कल्याणकरांकेड नव्हतं. अखेर बालाजी कल्याणकर यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमावारी (21 ऑक्टोबर 2024) दुपारी आमदार बालाजी कल्याणकर व त्यांचे काही समर्थक निळा गावात गेले होते. सुरुवातीला त्यांनी या निवडणुकीत मी उभा राहणार असल्याचे सांगत केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली. तसेच मलाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी ग्रामस्थाना केले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा धारण करत कल्याणकरांची शाळा घेतली. स्वत:च्या स्वार्थासाठी तुम्ही पक्ष बदलला, परंतु गेल्या पाच वर्षात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले? मराठा समाजाला तुम्ही न्याय का दिला नाही? सभागृहात कितीदा बोललात? समाजासाठी तुम्ही काय केले? असे अनेक प्रश्न बालाजी कल्याणकर यांना ग्रामस्थांनी विचारले. आमचा माणूस मनोज जरांगे पाटील यांनी आजही आपला लढा सुरू ठेवला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जसे म्हणतील तसेच होणार, कोणाला पाडायचे व कोणाला निवडणून द्यायचे हे जरांगेंच्या आदशानुसारच ठरणार असल्याचा सज्जड दम ग्रामस्थांनी कल्याणकरांना दिला.

मराठा आरक्षणाची धग नांदेड जिल्ह्यात कायम असून, लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही त्यांच्या मतदारसंघात अशाच रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत एका लग्नाच्या कार्यक्रमात गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आली होती. आज देखील निळा येथे त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात गावकर्‍यांनी जाब विचारला. त्यामुळे त्यांना निरुत्तर होत तेथून काढतापाय घ्यावा लागला.