राज्य सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर घ्यावे लागणार आहेत. यातून सरकार 40 लाख कोटी रुपये कमावणार असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हे वसूली सरकार आहे असेही पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, वसुली_सरकारने जाता जाता 100 तसेच 200 रुपयांचे स्टॅम्पपेपर बंद करून दिवाळीचे अनोखे गिफ्ट दिले आहे. सर्वसामान्यांना आता कुठलही काम असेल तर किमान 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागेल. साध अॅफिडेविट जरी करायचे असेल किंवा नॉन क्रीमिलेयर, विवाह नोंदणी वारस नोंदणी, नोटरी इतर काहीही असो आता प्रत्येक ठिकाणी 500 चा स्टँप लागेल.
राज्यात दिवसाला 100 रुपयाचे 10000 स्टॅम्प विकले जातात, म्हणजेच स्टॅम्प पेपरच्या किमती वाढवून सरकार रोज 40 लाख वसूल करणार आहे. एकीकडे कणभर देऊन मणभर दिल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे मात्र स्टॅम्पच्या किमती वाढवून सर्वसामान्यांच्या खिसा कापायचा असाच या सरकारचा कारभार असून या वसुली सरकारला वठणीवर आणण्यासाठी जनता देखील सज्ज आहे असेह रोहित पवार म्हणाले.