या पाकीट चोर सरकारला कळणार नाही, वाढत्या महागाईवरून जितेंद्र आव्हाड यांची टीका

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून गरजू महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले आहेत. पण महागाईमुळे दीड हजारची कोंबडी आणि चार हजार रुपयांचा मसाला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

महागाईबाबत एक बातमी एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, हे म्हणजे असं झालं, दीड हजारची कोंबडी 4 हजारचा मसाला..! निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या आमच्या भगिनींना आशेला लावून दीड हजार दिले खरे, पण खाद्यतेल, धान्य, दूध, भाज्या आणि गॅसचे भाव वाढवून सरकारने स्वतःचा ढोंगीपणा शेवटी उघड केलाच. आमच्या आयाबहिणींच्या हाताला काम अधिक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी हव्या आहेत. तेवढं केलं तरी त्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल. पण अर्थात मेहनत काय असते हे या पाकीट चोर सरकारला कळणार नाहीये असेही आव्हाड म्हणाले.