मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका

बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. यामुळे महिलांविषयीच्या घृणास्पद मानसिकतेला चाप बसणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मिंधे सरकारवर टीका केली. तसेच हे सरकार महिलाविरोधी आहे असेही नाना पटोले म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून नाना पटोले म्हणाले की, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून ‘बदला पुरा’ची बॅनरबाजी केली गेली ती केवळ स्टंटबाजी होती. असे एन्काऊंटर करून महिलांविषयीच्या घृणास्पद मानसिकतेला चाप बसणार नाही, हे पुण्यात वानवडी परिसरात स्कूल व्हॅनचालकाने सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर बसमध्ये केलेल्या अत्याचारातून बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं स्पष्ट दिसून आलं.

 

तसेच, घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज घरोघरी नारीशक्तीचा जागर होत असताना महाराष्ट्रासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. संपूर्ण महायुती सरकार आणि विशेषतः गृहमंत्र्यांना सध्या केवळ निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडलं. मात्र, महिला सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय महाविकास आघाडी आता गप्प बसणार नाही असेही पटोले म्हणाले.