आमचे सरकार आले तर मोदी तुरुंगात असतील, मिसा भारतींचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या मिसा भारती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकांनी ‘इंडिया’ आघाडीला संधी दिली आणि आमचे सरकार आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते भाजपच्या अनेक नेत्यांपर्यंत सर्वजण तुरुंगात असतील, अशा शब्दांत मिसा भारती यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. पाटलीपुत्र येथे प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लिम लीगशी केली. यावरून मिसा भारती यांनी मोदींना लक्ष्य केले. ‘इंडिया’ आघाडीने 30 लाख नोकऱया निर्माण करण्याचे, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि शेतकऱयांच्या पिकांना एमएसपी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु मोदींना यात तुष्टीकरण दिसत आहे. ते जेव्हाही बिहारमध्ये येतात तेव्हा आमच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. जर देशातील जनतेने ‘इंडिया’ आघाडीच्या हातात सत्ता दिली तर पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया मिसा भारती यांनी दिली.