‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेचा झेंडा, सोळा ग्रामपंचायतींना यश; 9 कोटी 20 लाखांची बक्षिसे मिळणार

‘माझी वसुंधरा अभियान’ 4.0चा राज्यस्तरीय निकाल जाहीर झाला. सांगली जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला. जिह्यातील 16 ग्रामपंचायतींनी या अभियानात यश मिळविले असून, तब्बल 9 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. दहा हजारपेक्षा जादा लोकसंख्येमध्ये सांगली जिह्यातील कासेगाव राज्यात तिसरे, अडीच ते पाच हजार लोकसंख्येत नांगोळे, पाच ते दहा लोकसंख्येत येडेनिपाणी या ग्रामपंचायतीने पहिला क्रमांक मिळविला.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 राबविण्यास सुरुवात झाली. ‘माझी वसुंधरा’ अभियान 4.0 मध्ये राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था व 22,218 ग्रामपंचायती अशा 22 हजार 632 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

‘माझी वसुंधरा’ अभियानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे ‘माझी वसुंधरा’ अभियानचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद, सांगलीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ग्रामपंचायत गटामध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कासेगावने  राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला असून, 1 कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. राज्यस्तर उत्तेजनार्थ पुणे विभागात सांगली जिह्यातील येळावी व कवलापूर ग्रामपंचायती आलेल्या असून, त्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये मिळतील. पाच हजार ते दहा हजार या लोकसंख्या गटामध्ये येडेनिपाणी ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून, दीड कोटींचे बक्षीस मिळणार आहे. राज्यस्तरावर उत्तेजनार्थ वाटेगाव व समडोळी या दोन ग्रामपंचायती आलेल्या आहेत. त्यांना प्रत्येकी 75 लाख, विभागस्तरावर वसगडे व नागठाणे ग्रामपंचायती विजयी झाल्या असून, त्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये मिळतील.

अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये नांगोळे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून, एक कोटीचे बक्षीस मिळणार आहे. पुणे विभागामध्ये बोरगाव व घाटनांद्रे या ग्रामपंचायती असून, अनुक्रमे 50 लाख व 15 लाखांचे बक्षीस मिळेल. ‘भूमी थिमॅटिक’मध्ये लंगरपेठ ग्रामपंचायत उत्तेजनार्थ 50 लाख रुपये, पुणे विभागामध्ये बनेवाडी व खंडोबाचीवाडी या दोन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख 15 लाखांचे बक्षीस मिळेल. ‘भूमी थिमॅटिक’मधील उच्चतम कामगिरीमध्ये पुणे विभागामध्ये कुंडलापूर व कौलगे या ग्रामपंचायतींचा प्रत्येकी 15 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

ग्रामपंचायतींची लौकिकास साजेशी कामगिरी ः तृप्ती धोडमिसे

n ‘माझी वसुंधरा’ अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांनी दोन्ही मूल्यमापनात लौकिकास साजेशी कामगिरी केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, पंचायत विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, जिह्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक सरपंचांनी प्रयत्न केल्याने ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेला यश मिळाले.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेला ‘क’ वर्ग गटात 50 लाखांचे बक्षीस

‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत ‘क’ वर्ग गटातून विभागीय स्तरावरील देवळाली प्रवरा नगपरिषदेस तृतीय क्रमांक मिळाला आहे. बक्षिसापोटी नगरपरिषदेला 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या कालावधीत कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यांची यंत्रणांमार्फत निवड करण्यात आली. देवळाली प्रवरा नगरपरिषदेस ‘क’ वर्ग गटातून तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्वाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवायच्या आहेत. नगरपरिषदेस मिळालेल्या बक्षिसामध्ये नागरिक, स्वच्छता कामगार, अधिकारी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मुख्याधिकारी नवाळे यांनी सांगितले.

जयसिंगपूरचा आठवा क्रमांक

महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेला पुणे विभाग स्तरावर आठवा क्रमांक प्राप्त झाला आहे.

जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी टिना गवळी यांच्या मार्गदर्शनातून तसेच उपमुख्याधिकारी प्रमिला माने, अभियानाचे नोडल अधिकारी जमीर मुश्रीफ, स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे, शहर समन्वयक अनिरुद्ध महाजन व सर्व अधिकारी—कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले आहे.