जालन्यात सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी रास्ता रोको, मेंढरं आंदोलनास्थळी

धनगर जमातीच्या अनुसूचित जमात आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जालन्यातील अंबड येथे 13 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासुन यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत हजारो मेंढ्या सह मोर्चाला सुरुवात करण्यात येवून बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने दुपारी 12 वाजता रास्ता रोको आंदोलन करुन अप्पर तहसीलदार ऋतुजा पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रामेश्वर खनाळ,अंबड पोलीस निरिक्षक नाचन यांना महिलांच्या हस्ते निवेदन सुपुर्द केले. या रास्ता रोको आंदोलनादरम्यान तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात मेंढरे आणली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधीमंडळ अस्तित्वात आल्यापासून संविधानात्मक मिळालेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित असुन हा आमच्यावर सामाजिक अन्याय होवून धनगर जमात विकासाच्या प्रवाहापासून दुर आहे. याकरिता धनगर जमातीला अनुसूचित जमाती आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी,ओबीसी आरक्षणाची तंतोतंत अमलबजावणी करण्यात येवून त्यात होणारी घुसखोरी रोखण्यात यावी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने तयार केलेला अभ्यास अहवाल जाहीर करण्यात यावा,धनगर समाजाला बहाल केलेल्या एक हजार कोटींच्या योजनेची अमलबजावणी करण्यात यावी,सोलापूर येथील शेखर बंगाळे यांना झालेल्या मारहाणीबद्दल मंत्री विखेंनी यांनी माफी मागुन आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.

तसेच देशातील आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे व त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी वर्षानिमित्त सरकारने कृती कार्यक्रम जाहीर करावा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी धनगर जमातीच्या अभ्यासु लोकांसोबत चर्चा करावी ठराविक नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत जमातीच्या प्रश्नावर चर्चा करु नये. धनगर व आदीवासी जमातीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येवून एकमेकांचे प्रश्न समोरासमोर ऐकून घ्यावेत.चौंडी येथे सुरु असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाची सरकारने दखल घेवून आंदोलकांशी चर्चा करावी. रास्ता रोकोमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.सुत्रसंचालन अ‍ॅड. लक्ष्मण गायके यांनी करून आभार अनिल भालेकर यांनी मानले.