आडवे चाललात तर गुलाल लागत नसतो; नाव न घेता जरांगे यांचा भुजबळांना इशारा

तुम्ही एकत्र आलात तर आम्ही समजून घ्यायचं आणि आम्ही एकत्र आलो की तुम्ही जळफळाट करायचा. मराठय़ांनी कधीही ओबीसींना आरक्षण देऊ नका, असे म्हटलेले नाही. मात्र ओबीसींच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. आम्ही कधीच जातीयवाद केला नाही. मराठय़ांनी मनावर घेतले तर या राज्यात काहीही होऊ शकते, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी नाव न घेता भुजबळांना दिला.

स्व. विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या समाधी स्थळी आयोजित अभिवादन कार्यक्रमाला मनोज जरांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी म्हणाले, मी जातीयवाद कधीच केला नाही. माझ्या मराठय़ांच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून रस्त्यावर उतरलो. आरक्षणासाठी स्व. विनायक मेटे यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

शिवस्मारकाची एक वीटही रचण्यात आली नाही – मेटे
स्व. विनायक मेटे यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जात आहोत. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य शिवस्मारक व्हावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र त्यानंतर एकही वीट रचली गेली नाही, अशी खंत ज्योती मेटे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

मातोरीतील दगडफेक भुजबळांच्या सांगण्यावरून
मराठा आणि ओबीसी यांच्यातील वादाचा कर्ताकरविता नाशिकमध्ये बसला आहे. नाशिकमध्ये बसलेल्या त्या ओबीसी नेत्याला मराठय़ांविषयी नेहमीच मळमळ राहिली आहे. छगन भुजबळ पोलिसांवर दबाव आणत आहेत. कुठंही घटना घडली की त्या घटनेत मराठा तरुणांना गुंतविण्याचे काम सुरू आहे. मराठा आणि ओबीसी मतांच्या राडय़ात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मताच्या जोरावर छगन भुजबळ फडणवीसांना दाबण्याचे काम करत आहेत. मातोरीत झालेला दगडफेकीचा प्रकार भुजबळांच्या सांगण्यावरून झाला आहे.