याद राखा! शब्द फिरवलात तर सलाईन काढून टाकेन! सरकारच्या दुर्लक्षामुळे मनोज जरांगे संतापले

मराठा आरक्षणाचा विषय तसेच आमच्या इतर मागण्या तातडीने तडीस नेतो, असा शब्द सरकारने दिला आहे. त्यामुळेच मी सलाईन लावण्यास परवानगी दिली. पण सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याद राखा, दिलेला शब्द फिरवाल तर सलाईन काढून टाकेन, असा खरमरीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकार दरबारी सुरू असलेल्या चालढकलीवर संताप व्यक्त केला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे काल मध्यरात्री भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर काही मंत्र्यांशी बोलणे झाले. सरकारची भूमिका सकारात्मक वाटल्याने आपण सलाईन लावण्यासाठी परवानगी दिली. परंतु सरकारने शब्द फिरवला तर सलाईन काढून फेकून देईन असे जरांगे म्हणाले. आम्हाला फक्त आरक्षणाशी देणेघेणे आहे. चर्चेतून मार्ग निघेल यावर विश्वास आहे. त्यामुळे सरकारनेही सहनशक्तीचा अंत बघू नये असे आवाहन जरांगे यांनी केले.

कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाहीर सांगा

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या दहापैकी आठ मागण्या मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या कोणत्या सरकारने मंजूर केल्या ते जाहीर सांगावे असे खुले आव्हान मनोज जरांगे यांनी दिले. लोकसभेतील निकालावरून सरकार जर आमच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर विधानसभेत यापेक्षाही वाईट हाल करेन असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला. छगन भुजबळ बधीर असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री चांगले पण त्यांचे ओएसडी कारस्थानी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले आहेत. तेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास आहे. पण त्यांचे ओएसडी कारस्थानी आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयही या कारस्थानात सामील आहेत. आता ते लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. मराठ्यांना बदनाम करण्यासाठीच हे सर्व चालू असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला. ओएसडीचे हे सर्व कारस्थान थोड्याच दिवसांत उघडे पडेल असेही ते म्हणाले.