आंतरवालीतील लाठीहल्ल्याला चार महिने पूर्ण, सरकारचे तोंडही पाहावेसे वाटत नाही! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

‘शांततेत आंदोलन करणार्‍या निष्पाप कार्यकर्त्यांवर अचानक लाठ्या चालवण्यात आल्या. लाठ्यांपाठोपाठ गोळ्यांचा वर्षाव झाला. अश्रुधुराचे लोट उठले. भजनाचा आवाज किंकाळ्यांमध्ये बदलला. माथी फुटली, रक्त सांडले. लहान मुलांच्या आक्रोशाने काळीज गोठून गेले… नुसती आठवण झाली तरी चीड येऊन सरकारचे तोंडही पाहावे वाटत नाही. असे निर्दयी सरकार कधीही येऊ नये!’ असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याला आज चार महिने पूर्ण झाले. सरकारने शब्द देऊनही मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आले नाहीत. पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. लाठीहल्ल्याचा तो प्रसंग आठवला तरी मन सुन्न होते. घरात घुसून मारहाण करणे… आवाज येऊ नये म्हणून स्पीकरचे वायर कापणे, पोलिसांनीच एकमेकांना लोटालोटी करणे आणि अचानक लाठीमार सुरू करणे या सगळ्या घटना आठवल्या तरी संतापाने लाही लाही होते. हा अत्याचार मराठा समाज कधीही विसरणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

सोयरपण जिथे होते ते सोयरे
सोयरे या शब्दावरून सरकारने खेळ केला. सोयरे म्हणजे सोयरपण जिथे होते ते सोयरे, अशी व्याख्या सांगतानाच तिथे आईचा आणि आईच्या जातीचा संबंध येतो कुठे, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सोयरे हा शब्द सरकारच्याच मंत्र्यांनी-कायदेतज्ज्ञांनी लिहून घेतला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, तसा कायदा करावा. तरच मराठा समाज विचार करेल, अन्यथा आमचे मुंबईतील उपोषण होणारच, असेही त्यांनी बजावले.

प्रभू श्रीरामचंद्र सरकारला सद्बुद्धी देवो
22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. आम्हालाही याचा अपार आनंद आहे. मराठा समाज मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी जाणार असल्याने हा सोहळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राने सरकारला सद्बुद्धी द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला. आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊ, असेही ते म्हणाले.