महायुतीचे काळे कारनामे! राष्ट्रवादीचं पुस्तक, काळे फुगे फोडून राज्य सरकारचा निषेध

राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत जयंत पाटील यांनी सरकारवर पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल केला आहे.

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपेन लॉन्च करत आहोत. त्यात लोकं त्यांची मतं मांडू शकतात. त्याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. 19 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत हे कँपेन सुरू राहीलल. महायुतीचे काळे कारनामे नावानं पुस्तक बनवून महायुतीविरोधात एल्गार करणार आहोत, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी काळे फुगे फोडून महायुती सरकारचा निषेधही करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये गेल्या 5 महिन्यांत तब्बल 1073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक नंबरवर पोहोचला आहे. तर गुन्हेगारीच्या बाबतीतही हे महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. एकीकडे महागाई वाढत चालली असताना शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत, हे डबल नाहीतर ट्रबल इंजिनचे सरकार आहे.

भ्रष्टाचाऱ्यांचा एकच‌ नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा असे चित्र राज्यात आहे. राज्यात 25 नेते असे आहेत जे आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये गेले अन् कारवाई बंद झाली. ताजे उदाहरण रविंद्र वायकर आहेत. म्हणजे तिकडे गेली की चौकशी काही होत नाही. आता खेडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या सुटू शकतात असं माझ्या वाचण्यात आले असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

“पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल

भ्रष्टाचारात बेसुमार वाढ झाली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे. राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले तरी मूग गिळून गप्प बसणारं महाराष्ट्रातील सरकार आहे. या सरकारच्या काळात पेपरफुटीचे घोटाळे प्रचंड वाढले. पाच वर्षात साडे 11 लाख विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला. नवे उद्योग आणता आले नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

या सरकारने गुन्हेगारीतही महाराष्ट्राला एक नंबरवर नेऊन ठेवलं आहे. डेटानुसार महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. मर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बलात्कारामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. हे आकडे पाहिल्यावर समजेल या लोकांनी कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे. हिट अँड रन प्रकरणात सर्व श्रीमंतांची मुले होती. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचे काम या सरकारने केले. आमचा कोणताही कार्यकर्ता किंवा आमदार रात्रभर कुणासाठी पोलीस ठाण्यात बसत नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता कुणाचे रक्त बदलण्याचा फंदात पडत नाही. ते सत्ताधारी आहेत. त्यांच्या जवळ सर्व श्रीमंत लोकं आहेत त्यांना सोडवण्यात ते व्यस्त असतात, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केली.