परतीच्या पावसाचे पाऊल निघेना; नंदूरबारमध्येच रखडला, पाच दिवस पावसाचा इशारा

देशभरातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी मॉन्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातील नंदूरबारमध्येच रखडला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा ताप जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण असल्याने मुंबई आणि उपनगरात उकाडा जाणवत आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास रखडल्याने पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

परतीचा मान्सून उत्तरहिंदुस्थानातून परतला आहे. मात्र, त्याचा परतीचा प्रवास नंदूरबारमध्येच रखडला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 5 दिवस 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ऑक्टोर हिटचा ताप वाढण्याची शक्यता आहे.