मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांना पळवून लावा! आदित्य ठाकरे यांच्या मुलुंड आणि प्रभादेवी येथे झंझावाती सभा

गेली दोन-अडीच वर्षे मुंबई – महाराष्ट्रावर अन्याय सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे हक्काचे मतदार, शिवसैनिक, महाराष्ट्र हिताचा मतदार वाट पाहत होते ते 20 मेची. ही वाट आपण अशासाठी पाहत होतो की, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली, जे मुंबई, जे महाराष्ट्र लुटत होते त्यांना पळवून लावायचे आहे. केंद्रातले सरकार बदलायचे आहे आणि तो दिवस आता जवळ आला आहे, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई आणि उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारसभेत मुलुंड आणि प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, आमदार सुनील राऊत, उपनेते सचिन अहिर, उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, विभागप्रमुख सुरेश पाटील, काँग्रेसचे चरणसिंह सप्रा, रॉय मनी, सपाचे निसार खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गुजरातला 3 हजार कोटी, महाराष्ट्रात एक रुपया नाही

जेव्हा निसर्ग वादळ आले, तौक्ते वादळ आले, कोरोनाचा संकटकाळ होता त्यावेळी आज रोड शो करणारे भाजप नेते कुठे होते? निसर्ग वादळ आले, तौक्ते वादळ आले त्यावेळी महाविकास आघाडीने आपल्या तिजोरीतून नुकसानभरपाई दिली. या वादळांचा फटका महाराष्ट्राला बसला असताना पंतप्रधान मोदी गुजरातला विमानाने गेले ते महाराष्ट्रात आले नाहीत. गुजरातला 3 हजार कोटी नुकसानभरपाई दिली, पण महाराष्ट्राला एक रुपया दिला नाही. आज हा महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ही लढाई शिवसेना विरुद्ध चिंधीचोर, गद्दार गँग अशी आहे

आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार बसले आहे. ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध चिंधीचोर, शिवसेना विरुद्ध गद्दार गँग, शिवसेना विरुद्ध बापचोर, शिवसेना विरुद्ध पक्षचोर अशी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आता तडजोड नाही

मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांशी तडजोड नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जे बदलायला निघाले आहेत त्यांच्याशी तडजोड नाही. जे लोकशाही धोक्यात आणतात त्यांच्याशी तडजोड नाही. ही हुकूमशाही मानणारी भाजप आहे. त्यामुळे हे हुकूमशाही सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपला मुंबई सर्वसामान्यांना परवडेनाशी करायची आहे!

लोकसभेची निवडणूक असली तरी मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. भाजपचे जे विचार आहेत ते मुंबई तोडण्याचे आहेत, पण त्याआधी भाजपला ही मुंबई कमजोर करायची आहे, पण तुम्ही आम्ही इथे आहोत म्हणून भाजप मुंबई आणि महाराष्ट्राचे तुकडे करू शकत नाही. त्यांचा प्लॅन बी आहे की, मुंबई सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी करा, मुंबई महाग करा, इथले राहणीमान महाग करा. भाजपचे हे स्वप्न त्यांना साकारू द्यायचे आहे की नाही ते तुम्ही 20 मे रोजी दाखवून द्यायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.