कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाशिवाय सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न सुटणार नाही

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने घेतली विनायक राऊत यांची भेट

कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी टर्मिनस व्हावे म्हणून आपण केद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, पण आता हा प्रश्न राज्य सरकारवर दबाव टाकून सोडवण्याची गरज असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच कोकण रेल्वेचे हिंदुस्थानच्या रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार मंजूर करून पेंद्राला पाठवणार नाही, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारवर दबाव टाकू असे अश्वासन राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव सिंधुदुर्ग विमानतळाला द्यावे, अशी मागणी केली होती, तशीच प्रा. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला द्यावे अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. असे विनायक राऊत यांनी सांगितले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज अॅड. संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार राऊत यांची भेट घेतली. यावेळी सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, 26 जानेवारी रोजी होणाऱया आंदोलनात शिवसैनिक सहभागी होतील असे आश्वासन राऊत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱयांना दिले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते.