अंबाबाई मंदिरात गर्दीचा उच्चांक, दर्शनासाठी सात ते आठ तास; देवस्थान समिती आणि पोलिसांची यंत्रणा ढेपाळली

साडेतीन शक्तिपीठांपकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात शारदीय नवरोत्रोत्सवानिमित्त दररोज भाविकांची उच्चांकी गर्दी होत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तर गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांची यंत्रणा ढेपाळली. अर्ध्या तासात देवीचे दर्शन मिळण्याची व्यवस्था केली असताना, आज प्रत्यक्षात रांगेतून दर्शनासाठी तब्बल सात ते आठ तास लागत होते शिवाय मुखदर्शनासाठीही दोन-तीन तास लागत होते.

शनिवार,रविवार सलग सुट्टीचे दिवस असल्याने कोल्हापुरात गर्दीचा महापूर लोटला आहे. करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी आज मध्यरात्री दोन पासूनच भाविकांनी रांगेत गर्दी केली होती. दिवसभरात ही गर्दी इतकी वाढली की भाविकांना दर्शनासाठी तब्बल सात ते आठ तास रांगेत उभा रहावे लागले.त्यात सकाळ पासून दुपारपर्यंत कडकडीत ऊन त्यानंतर दुपारी अर्धा ते पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसाने तर सर्वांची तारांबळ उडाली.

दरम्यान मुखदर्शनासाठीही रांगच रांग लागली होती. मुखदर्शन घेण्यासाठी सुद्धा दोन-तीन तास लागत होते. दिवसभरातील या उच्चांकी गर्दीच्या नियंत्रणासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांची यंत्रणा चांगलीच ढेपाळल्याचे दिसून आले.