जालन्यात शाळकरी मुलाचे अपहरण करत मागितले पाच कोटी, मुलाची आठ तासात सुखरूप सुटका

जालन्यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाची अपहरण करुन पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली असता स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत  आठ तासात मुलाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी तीन अपहरण कर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान 25 जून रोजी सकाळी आठच्या दरम्यान फिर्यादी व्यापारी कृष्णा गोपीनाथराव मुजमले रा. पुष्कर हॉस्पिटल समोर, अमरछाया टॉकीजजवळ, नविन जालना यांचा 13 वर्षीय मुलगा त्याच्या राहत्या घरातुन सायकलवर नारायणा इ-टेक्नो या शाळेत निघुन गेला. सकाळी 11 च्या दरम्यान फिर्यादी यांचे मोबाईल फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन सांगितले की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्यास सुखरुप परत पाहीजे असल्यास संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जालना तालुक्यातील देवमुर्ती येथे पाच कोटी घेवुन या. पैसे देऊन मुलगा परत घेऊन जा. काही हलचाल केली तर मुलास एडस् स्टेराईडसचे इंजेक्शन देवु अशी धमकी दिली होती.

सदर बाब फिर्यादीने तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना सांगितली. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना पाचारण करुन सदर प्रकरणांबाबत माहीती देवुन मुलाचा शोध सुचना व मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सदर बाजार जालना येथील पोलीस अधिकारी, अमंलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन पथकास योग्य सुचना व मार्गदर्शन करुन पथकासह मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

अपहरण झालेल्या मुलाचे वडीलास सोबत घेऊन आरोपीसोबत वेळोवेळी संभाषण चालु ठेवले. आरोपीतांनी वारंवार पाच कोटी, तीन कोटी अशी पैशाची मागणी करुन रात्री आठ वाजता पैशाची बॅग कन्हैयानगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपाचे मागे ठेवण्यास सांगितले. ठरल्या प्रमाणे पोलीसांनी सदर ठिकाणी व परिसरात सापळा लावुन पैसे घेऊन जाण्यासाठी घेऊन आलेला आरोपी रोहित राजा भुरेवाल रा. पुष्कर हॉस्पीटल समोर जालना यास शिताफीने पकडले. त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस करुन इतर दोन आरोपी अरबाज अवकर शेख रा. उडपी हॉटेल जवळ टांगा स्टॅण्ड जालना व वरुन नितीन शर्मा रा. गायत्रीनगर नवीन जालना अशा तिन आरोपीतांना बारीबारीने वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील ओमनी गाडीतील अपहरण झालेला तेरा वर्षीय मुलगा सुखरुप ताब्यात घेतला.

तिन्ही आरोपीकडुन एक ओमनि कार, एक अपाची मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द फिर्यादी कृष्णा मुजमुले यांनी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे फिर्याद दिल्याने आरोपीं विरुध्द गुन्हा कलम 370,363,364,364(अ), 120 (व), 323, 506, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरोडे पोलीस ठाणे सदर बाजार हे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, उपनिरीक्षक नरोडे, सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, विजय डिक्कर, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, गोपाल गोशिक, सतिष श्रीवास, योगेश सहाने, धिरज भोसले, शेख अजिम, संजय राऊत यांनी केली आहे.