ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी

‘स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मोठमोठय़ा कंपन्या सरकारने काढल्या. प्रत्येक क्षेत्रात सरकारचा हात होता; परंतु ज्याचा राजा व्यापारी असतो, त्याची जनता भिकारी असते. सरकारचा हात एवढा अशुभ आहे की, जिथे हात लागला, तिथे सत्यानाश झाला. त्यामुळे मूलभूत गरजा, रस्ते, वीज, पाणी आणि शेतीच्या प्रश्नांना प्राथमिकता मिळाली नाही,’ असे परखड मत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

दै. ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पायाभूत सुविधा आणि ऊर्जाक्षेत्रातील हिंदुस्थानचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘पूर्वी पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागायचे. आज केवळ दोन तास लागतात. ‘बीओटी’ तत्त्वावर रस्ता बांधायला दिला नसता तर त्याला 25 वर्षे लागली असती. सरकारचा हस्तक्षेप कमी केल्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळाली.’ पुण्यात प्रदूषण वाढत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, मी पुण्यात शिक्षणासाठी  महर्षीनगर येथे राहत असताना तेथून पर्वती स्पष्टपणे दिसायची. एवढी सुंदर हवा पुण्याची होती. आता पुण्याची हवा कशी आहे, असे सांगत त्यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. चाळीस टक्के प्रदूषण हे पेट्रोल, डिझेलमुळे होते. त्यामुळे पर्यायी इंधननिर्मिती आणि त्यावर आधारीत वाहने वापरण्याबाबत त्यांनी माहिती दिली. पुण्याला जोडणाऱ्या रस्त्यांचा विस्तार सुरू आहे. पुण्यातही तीन -तीन लेअरचे पूल बांधण्याचा विचार आहे.

वर्षअखेर नॅशनल हायवेंचे जाळे अमेरिकेसारखे

देशात कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहेत. अनेक महामार्गांचे काम सुरू आहे. दिल्ली-मुंबई हायवेचे काम सुरू असून याच हायवेला सुरतवरुन नाशिक,  नगर, सोलापूर असा जोडण्यात येणार आहे, असे सांगत 2024 संपण्यापूर्वी हिंदुस्थानच्या नॅशनल हायवेचे नेटवर्क अमेरिकेच्या बरोबरीचे राहील, असे पेंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.