Rajasthan news – सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, गाडीतील पाच जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

गुजरात येथून जोधपूरकडे गाडी येत असताना टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नाल्यात जाऊन पडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर एकाची अवस्था गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या दाहोद परिसरात राहणाऱ्या पाच लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये प्रताप भाई, रामूराम, उषा बेन, पुष्पा देवी आणि 11 महिन्याचे बाळ आशु यांचा समावेश आहे. याशिवाय 50 वर्षीय महिला शारदा देवी यांची अवस्था गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तहसीलदार बिश्नोई आणि डेप्युटी मुकेश चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या भागात सहा दिवसांपूर्वी तीन मोठे अपघात झाले होते. त्यात 20 लोकांचा मृत्यू झाला आणि 51 जण गंभीर जखमी झाले होते.