गृहमंत्री फडणवीस कायदा सुवस्था चांगली राहू देत नाही; मनोज जरांगे पाटील यांची टीका

सरकारचे लक्ष गोरगरीब जनतेवर नसून फक्त आणि फक्त सत्तेवर त्यांचे लक्ष केंद्रित आहे. त्या छोट्या लेकरांना काही कळत नाही अन् कायदा सुव्यवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत, अशी खरमरीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करून नेत्यांच्या पुरोगामी भूमिकेवर देखील जरांगे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारचे लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांच्या एकत्र येण्याचा उल्लेख करत जरांगे यांनी इशारा दिला की, सरकारला या समाजांवर होणार्‍या अन्यायाची किंमत चुकवावी लागेल. पाच वर्षांत काहीच न करणारे, आता निवडणुकीच्या तोंडावर वचने देतात, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. आमचे घोंगडी खाली हात गुंतलेले आहेत, असे त्यांच्यातले लोक आम्हाला सांगताय, कोणालाही फडणवीस आरोप करायला लावताय. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाचे मन जिंकावे लागते तेव्हा सत्ता येते. आमच्या गोरगरीबांच्या हातात सत्ता आली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना कधीच गुंतवणार नाही. तुम्ही राजीनामा देऊ नका, गोरगरिबांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्य आहे. यांनी ठरवले तर एका दिवसात ते मराठा आरक्षण देऊ शकतात. मुळात यांना आरक्षण द्यायचे नाही, धनगर समाज, मराठा समाज यांच्या आरक्षणाचा विषय फडणवीस यांनी घोळत ठेवला आहे. फडणवीस यांच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. ते ऐकमेकांच्या विरोधात कधी बोलणारच नाहीत. ते सत्तेत आहे त्यामुळे ते एकमेकाच्या विरोधात बोलत नाहीत. सत्तेत जाऊन आपले हक्क घ्यावे लागतील, त्यासाठी सर्वांनी सोबत आले पाहिजे.

निवडणुकीसाठी 29 ऑगस्टला निर्णय घेणार
विधानसभा निवडणुकीबाबत 29 ऑगस्ट रोजी जो बैठकीत निर्णय होईल. त्यानंतर दिशा ठरवली जाईल, सर्व धर्माच्या गोरगरीबांनी आपले उमेदवार द्यावे. एकत्र येऊन पाडले तसे एकत्र येऊन आपले अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी करायचे आहे. असे सांगून 75 वर्ष दुसर्‍याला संधी दिली. पाच वर्ष गरीब जनतेला संधी द्या. आपली आघाडी नाही तर सर्व मिळून अपक्ष उभे करायचे आहेत. शासनाने अद्याप आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, आता ठरल्याप्रमाणे 29 ऑगस्टपर्यंत वाट पाहू, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.