सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जाळली बैलगाडी; अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त

>> प्रसाद नायगावकर

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी एका शेतकऱ्याने आपली बैलगाडी जाळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी कुणाल जतकर यांनी त्यांची स्वतःची बैलगाडी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ साखर कारखान्याजवळ जाळली. शेतकरी कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. मात्र, त्या पत्राची दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी कुणाल जतकर यांनी नागपूर – तुळजापूर महामार्गावर स्वतःची बैल गाडी जाळून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न अनोख्या आंदोलनातून केला. यावेळी पेरणी तर कशी बशी झाली. सावकाराकडून पैसे आणून केली. मात्र, आता पिकांना खत देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता या बैलगाडीचे काय करायचे, असा सवाल करत संतप्त शेतकरी कुणाल जतकर यांनी बैलगाडी जाळत सरकारचा निषेध केला आहे.