निवडणुका संपल्या, आता जनहिताची कामे सुरू करा; एक्झिट पोल्सप्रकरणी वृत्तवाहिन्यांच्या सीबीआय चौकशीची याचिका फेटाळली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये कुणालाच बहुमत दाखवण्यात आले नव्हते. त्यामुळे विशेषतः शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहायला मिळाले आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. असे एक्झिट पोल्स दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. निवडणुका संपल्या आहेत, आता जनहिताची कामे सुरू करा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एनडीए सरकारला अप्रत्यक्षरीत्या सणसणीत टोला लगावला.

निवडणूक प्रक्रिया किंवा त्याबाबतच्या सर्व बाबी निवडणूक आयोग पाहील आम्ही निवडणूक आयोग चालवणार नाही ही स्पष्टपणे राजकीय हिताच्या दृष्टीने करण्यात आलेली याचिका आहे, अशी टीपण्णीही सर्वोच्च न्यायालयाने केली. एक्झिट पोल प्रसिद्ध करून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची कथितरीत्या दिशाभूल केल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला होता. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

ही जनहित याचिका नसून पूर्णपणे राजकीय हित याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी करता येणार नाही. निवडणुका संपल्या असून आता जनहिताची कामे सुरू करा.

z धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय?

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विविध वृत्तवाहिन्यांवरून एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे शेअर बाजारात अचानक तेजी आली आणि 4 जून रोजी अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर शेअर बाजार धडामकन कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे लक्षात घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली.