वाघाडी नदीच्या पुरात आयशर टेम्पो वाहून गेला, तिघांची सुखरुप सुटका

समुद्रपूर शहरालगत असलेल्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रकमधील तिघांनी वेळीच उडी घेतल्याने ते सुखरुप बचावले आहेत. विलास शहाणे, हिरालाल बारेड आणि रामकिसन गौतम अशी तिघांची नावे आहेत. गेले पाच दिवस वर्धा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे.

सदर ट्रक लाहोरीवरुन समुद्रपूरकडे जात होता. यावेळी समुद्रपूर शहरालगत असलेल्या वाघाडी नाल्याच्या पुरात ट्रक वाहून जाऊ लागला. यावेळी वेळीच प्रसंगावधान राखत ट्रकमधील तिघांनी उडी घेतली. ट्रकमधून उडी घेतल्यानंतर तिघांनी झाडाला पकडले आणि झाडावर चढून बसले.

समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपात्कालीन व्यवस्थेला कळवले. मात्र पुराचे पाणी वाढत असल्याने प्रथम त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावतील युवकांच्या मदतीने जवळपास एक तासांच्या अथक परिश्रमानंतर तिघांची पुरातून सुखरूप सुटका करण्यात आली. ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या या धाडसीपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार मानले आहेत.