बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील दगडफेकीमागे छगन भुजबळांचा हात; मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप

बीड जिल्ह्यातील मातोरी गावात दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा, त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितले असावे. भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. तसेच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांवर बारीक लक्ष ठेवावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांच्या मातोरी गावात 27 जून रोजी झालेल्या दगडफेकीनंतर शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

गावात गुरुवारी रात्री जो प्रकार घडला, तो शंभर टक्के छगन भुजबळ यांनीच करायला लावला, अशी मला शंका येते. वडीगोद्री येथेच आंदोलन का करायला लावलं? एल्गार सभा सुद्धा अंबड मधूनच सुरू केली होती. प्रति सभा घेतली मग जातीयवादी नाहीतर काय? असे प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी करून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही. त्यांना हल्ला घडायला माझेच गाव का सापडले ? छगन भुजबळला मुद्दाम वाटेत जायची सवय आहे. आंदोलन करायला विरोध नाही; पण आमच्या आंतरवालीच्या समोरच कोणत्या हेतूने ठेवले होते, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.

आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असताना मी दंगल होऊ दिली नाही, मला अशी शक्यता दिसते की तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावायाचे भुजबळनी सांगितले. आपल्या गाड्या फोडून टाका. त्या गोरगरीबांवर आरोप घाला. बिडच्या पालकमंत्र्यांना सांगतो की, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. मला बदनाम करण्यासाठी छगन भुजबळ यांनी ही शाळा केल्याची मला शक्यता वाटत असून, छगन भुजबळचं ऐकून माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होऊ देऊ नका, नाहीतर महाराष्ट्रातला मराठ्यांचा नाईलाज होईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

तो मस्ती आल्यासारखे वागतो, मातोरीत कुणालाही त्रास होता कामा नये; अन्यथा राज्यातील सगळे मराठे तिथे जातील सर्व मराठ्यांनी ओबीसींनी शांत राहावे, भुजबळनी सर्वपक्षीय ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर सोडलेत. राजकारणासाठी मराठा -ओबीसी संघर्ष घडवून सत्ता मिळविण्याचा भुजबळचा डाव असून, सगेसोयरेची आमची व्याख्या घेतल्याशिवाय आम्हाला कुठलीच अंमलबजावणी मान्य नाही. राज्याच्या आमच्या दौर्‍याची तयारी पूर्ण करुन सगळ्यांना मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावे, असेही आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.