राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना, बाळासाहेब थोरात यांचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 10 वर्षांच्या मनमानीला उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत, असा जोरदार टोला काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला. षण्मुखानंद सभागृहात संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्याला ते संबोधित करत होते.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने 56 इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे. लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा.” असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकऱ्यांना केले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरू आहे पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे. पण हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. लाडकी बहीण तर आता आली लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरू आहे. मुंबईतील सर्व महत्वाच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत. मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.